मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देतो. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो.
पात्रता :
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२३ करिता अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:
1. उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ ते कमाल २६ वर्ष या दरम्यान असावे. म्हणजे जीचा वाढदिवस ०३/०३/१९९७ ते ०३/०३/२००२ दरम्यान येतो अशी व्यक्ती (दोन्ही दिवस अंतर्भूत)
2. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल
3. उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.
4. मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
स्वरूप:
1. फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून १२ महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल.
2. निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. या प्राधिकरणांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, शासनाचे सचिव, महामंडळांचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा समावेश असेल.
3. प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.
4. नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फिल्ड वर्क असे संबोधले जाईल.
5. फिल्ड वर्क सोबतच आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल. प्रत्येक फेलोसाठी यापैकी एका शैक्षणिक संस्थेची निवड करण्याचे अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास असतील. फेलोंना शैक्षणिक संस्था निवडीचा अधिकार नसेल.
6. फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र मिळेल.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न:
१. महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम काय आहे?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना शासनाचा भाग बनून काम करण्याची संधी देतो. फेलोंच्या नाविन्यपूर्ण कल्पनांची प्रशासनास मदत होते. फेलोंचा उत्साह व तंत्रज्ञानाची समज यामुळे प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान व अनुभव यामुळे तरुण फेलोंचा दृष्टिकोन विस्तारतो.
२. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उप मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. २०२० पर्यंत सदर कार्यक्रम राबविला गेला. मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये हा कार्यक्रम पुनश्च सुरु केला आहे.
३. मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ चा कालावधी किती आहे?
मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ चा कालावधी १२ महिन्यांचा आहे.
४. मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ साठी मी कधी अर्ज करू शकते / शकतो?
मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ साठी अर्जाची प्रक्रिया ०७/०२/२०२३ रोजी सुरु होत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०२/०३/२०२३ असेल.
५. मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ साठी अर्जाचे शुल्क किती आहे?
मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ साठी अर्जाचे शुल्क रु. ५०० एवढे आहे
६. निवड प्रक्रिया किती स्तरांवर पार पडते?
निवड प्रक्रिया २ स्तरांवर पार पडते. प्रथम स्तरावर सर्व अर्जदारांना वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. या ऑनलाईन परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणारे २१० उमेदवार दुसऱ्या स्तरावरील निवडीस पात्र ठरतात. या उमेदवारांना दिलेल्या ३ विषयांवर निबंध सादर करावे लागतात. अंतिम निवडीसाठी निबंध सादर केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. अंतिमतः योग्यतेच्या आधारे ६० उमेदवारांची फेलो म्हणून निवड होते. ऑनलाईन परीक्षेतील विषय तसेच अंतिम निवड करताना ऑनलाईन परीक्षा, निबंध व मुलाखत यांना असलेले भारांकन या बाबतचा तपशील या संकेतस्थळावरील ‘निवड प्रक्रिया’ या टॅब अंतर्गत देण्यात आलेला आहे.
७. अर्ज करताना प्रमाणपत्र व इतर कागदपात्रांच्या मूळ प्रतींची आवश्यकता असते का?
अर्ज करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र व इतर कागदपात्रांच्या मूळ प्रतींची आवश्यकता नसते. या कागदपत्रांमधील माहिती अर्ज करताना भरावयाची असते. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे मुलाखतीच्या दिवशी तपासली जातात. मूळ कागदपत्रे व दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यास उमेदवाराला निवड प्रक्रियेतून बाद केले जाऊ शकते वा त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते.
८. फेलो म्हणून मी माझ्या कामाचा अहवाल कोणाला सादर करेन?
फेलो थेट वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतील. हे अधिकारी फेलोंना मार्गदर्शन करतील. या अधिकाऱ्यांसोबत फेलोंचा वारंवार संवाद होईल, फेलोज त्यांना आपल्या कामाबद्दल अवगत करतील. फेलोंना आपला मासिक अहवाल संबंधित अधिकारी तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयास सादर करावा लागेल. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय दर ३ महिन्यांनी फेलोंच्या कामगिरीचे मूल्यमापन करतील. मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वर्षातून दोन वेळा फेलोंच्या कामकाजाचा आढावा घेतील.
९. फेलोंच्या कामाचे स्वरूप कसे असते?
प्रत्येक फेलोच्या कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यांच्या प्लेसमेंट नुसार व ते ज्या कार्यालयासोबत किंवा अधिकाऱ्यासोबत काम करतात त्या प्रमाणे त्यात बदल होतो. एखाद्या चालू असलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत मदत करणे, एखाद्या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी, प्रकल्पाचे संनियंत्रण, शासकीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा किंवा धोरण निर्मिती अशा विविध स्वरूपाचे काम फेलोज करतात. कामाच्या स्वरूपानुसार फेलोशिपच्या संपूर्ण कार्यकाळात फेलो एका प्रकल्पावर किंवा एका पेक्षा अधिक कार्यक्रमांवर काम करू शकतो. यापूर्वी विविध प्राधिकरणांसोबत काम करणाऱ्या फेलोंनी एकत्र येऊन आपल्या नियमित कामकाजा व्यातिरिक्त नाविन्यपूर्ण प्रकल्प व धोरणात्मक प्रस्ताव शासनास सादर केले होते.
१०. फेलोंमध्ये विशिष्ट शाखेचे शिक्षण, कौशल्ये किंवा इतर गुण यांना प्राधान्य दिले जाते का?
कोणत्याही शाखेचा प्रथम वर्ग पदवीधर फेलो म्हणून काम करू शकतो. आत्मविश्वास, नेतृत्त्व गुण, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक कौशल्य, संवाद कौशल्य आणि विविध घटकांसोबत काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये फेलोंकडे असणे अपेक्षित आहे. निवडीचे निकष वगळता इतर निकषांचा (जसे लिंग, लैंगिकता, वैवाहिक स्थिती, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी, व्यवसाय, अपंगत्व, ग्रामीण पार्श्वभूमी) फेलोंच्या निवडीवर कोणताही परिणाम होत नाही.
११. फेलोंसाठी प्रशिक्षणाची तरतूद आहे का?
या वर्षी आपण आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांचे सोबत फेलोशिप कार्यक्रम राबवित आहोत. या दोन्ही संस्था प्रत्येकी ५०% फेलोंना प्रभावी धोरण निर्मितीसाठी आवश्यक साधने व पद्धती यांचे प्रशिक्षण देतील. प्रत्यक्ष कॅम्पस वर व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे प्रशिक्षण दिले जाईल. फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सर्व फेलोंना या प्रशिक्षण कार्यक्रमांना हजर राहणे व ते यशस्वीरित्या पूर्ण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांचा तपशील योग्य वेळी दिला जाईल. या प्रशिक्षण कार्यक्रमाशिवाय, महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत संवाद व विविध संस्थांना भेटींचे आयोजन केले जाते. या संवाद व भेटींच्या माध्यमातून फेलोंना खूप काही शिकता येते. फेलोंना प्रत्यक्ष प्लेसमेंटच्या ठिकाणी करावयाच्या कामासाठी प्रशिक्षण दिले जात नाही. याचे कारण म्हणजे, प्रत्येक फेलोचे प्लेसमेंट नुसार बदलणारे कामाचे स्वरूप. संबंधित प्राधिकरणाची गरज व फेलोची कौशल्ये यावर कामाचे स्वरूप ठरते. फेलोंनी काम करताकरता शिकणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी फेलोंना मार्गदर्शन करतात.
१२. फेलोंना भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होतात?
शासनासारख्या महत्त्वाच्या व विशाल यंत्रणेसोबत काम करण्याचा अनुभव हा अत्यंत दुर्मिळ व एकमेवाद्वितीय असा असतो. फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून फेलोंमध्ये विविध कौशल्ये वाढीस लागतात. यामध्ये व्यवस्थापन कौशल्ये, संवाद कौशल्ये, साधन संपन्नता, प्रश्न सोडविण्याचे कसब यांचा समावेश होतो. या अनुभवातून फेलोंना शैक्षणिक व करिअर संबंधातील अनेक संधी उपलब्ध होतात. प्रशासकीय सेवा, सार्वजनिक धोरण, धोरण निर्मिती, व्यवस्थापन, कन्सल्टन्सी, सामाजिक क्षेत्र हे करिअरचे काही पर्याय आहेत.
लाभ :
१) फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील.
२) फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व इमेल आयडी दिले जाईल.
३) दरमहा रु. ७०,०००/- विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक रु. ५,०००/- असे एकूण रु. ७५,०००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.
४) फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण ८ दिवसांची रजा अनुज्ञेय राहील.
५) फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल.
६) आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल.
७) १२ महिन्यांचे फिल्डवर्क व आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविला जाणारा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या फेलोंना शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबविली जाईल. निवड प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
टप्पा १:
भाग १ : ऑनलाईन परीक्षा
भाग २ : सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा २ साठी २१० उमेदवार शॉर्टलीस्ट करणे
टप्पा २:
भाग १ : शॉर्टलीस्ट केलेले उमेदवार निबंध अपलोड करतील
भाग २ : मुलाखत (शॉर्टलीस्ट केलेल्या व निबंध सादर केलेल्या उमेदवारांसाठी लागू)
भाग ३ : अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे
ऑनलाईन परीक्षेचे स्वरुप :
बहुविविध पर्याय असलेले वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न
माध्यम:
परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल व जेथे व्यवहार्य असेल तेथे प्रश्न व पर्यायी उत्तराचे मराठीत भाषांतर पुरविले जाईल
एकूण गुण : १००. प्रत्येक प्रश्नास १ गुण
कालावधी : ६० मिनिटे
टप्पा २ साठी उमेदवार शॉर्टलीस्ट करणे
एकूण गुण १०० पैकी राहतील
सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल.
शॉर्टलीस्ट केलेले उमेदवार ३ निबंध लिखित स्वरुपात सादर करतील. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असू शकतात.
निबंधाचे विषय उमेदवारांना इमेल व संकेतस्थळाद्वारे कळविले जातील.
सर्व ३ निबंध सादर करणाऱ्या शॉर्टलीस्ट केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. सर्व ३ निबंध अपलोड न करणारे शॉर्टलीस्ट झालेले उमेदवार मुलाखतीस पात्र राहणार नाहीत.
अंतिम निवड:
उमेदवारांच्या अंतिम निवडीकरीता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धत वापरली जाईल.
ऑनलाईन चाचणीचे १०० पैकी गुण १५ पैकी गुणांमध्ये रुपांतरीत करुन+ निबंध ३० गुण+ मुलाखत ५० गुण + पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक पदवी ५ गुण
निवड झालेल्या ६० उमेदवारांची यादी व १५ उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल
निवड झालेल्या उमेदवारांनी विहित मुदतीत ऑफर लेटर स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे निर्माण होणारी रिक्त पदे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून भरण्यात येतील
कृपया नोंद घ्या :
मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांस आपल्यासोबत सर्व गुणपत्रिका, अनुभवाची प्रमाणपत्रे, ओळखपत्र व इतर संबंधित कागदपत्रांची मूळ प्रत व नक्कल आणणे आवश्यक आहे
मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतीचा दिवस व वेळ इमेल द्वारे कळविण्यात येईल
मुलाखतीस हजर राहण्यासाठी उमेदवारांना प्रवासखर्च किंवा इतर कोणताही खर्च देण्यात येणार नाही
अटी व शर्ती :
१. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोंना इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टीस, असाईनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम (आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांनी फेलोशिपसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाखेरीज) स्विकारता येणार नाही.
२. या १२ महिन्यांच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते व मुदतवाढीची किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद नाही.
३. १२ महिन्यांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही.
४. ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहतील.
५. फेलोंना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील.
६. फेलोंच्या मुलाखतीच्यावेळी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय तसेच ओळखपत्र आदी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फेलोंनी रूजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल.
७. फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तव्य करावे लागेल.
८. फेलोंच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही
९. नियुक्तीचे पत्र (ऑफर लेटर) मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे बंधन फेलोंवर असेल. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल.
१०. फेलोशिपच्या कालावधीत फेलो कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही.
Main Web Site : https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/indexmr.html
No comments:
Post a Comment